
यशाचा पासवर्ड !!!
राजर्षी शाहू महाराजांकडे एक ज्योतिषी आला. मी साऱ्या विद्या जाणतो. मी आपलं अचूक भविष्य सांगतो. असं तो राजर्षींना सांगू लागला. त्याला थांबवत राजर्षी म्हणाले, माझं भविष्य नंतर बघू. आपण जर एवढे भविष्यज्ञानी आहात, तर मला तुमचंच आजचं भविष्य सांगा ?
तसा तो ज्योतिषी म्हणाला, 'महाराज, आज माझा दिवस अत्यंत शुभ आहे. मान-मरातब-सन्मान मिळण्याचा आज मला योग आहे. अत्यंत आनंदी असा माझ्यासाठी हा आजचा सर्वोत्तम दिवस आहे !
एवढ ऐकल नि राजर्षि कडाडले, या ज्योतिषाला ताबडतोब इथंच चाबकाचे पन्नास फटके मारा !
ज्योतिषी गयावया करत राहिला, पण त्याला चाबकाचे पन्नास फटके पडले आणि मग राजर्षी म्हणाले, "ज्योतिषीबुवा आज तुमच्यासाठी मान-मरातब-सन्मानाचा शुभ दिवस होता. मग ? तुमचं भविष्य खोट कसं ठरलं ?" ज्योतिषी फक्त मान खाली घालून चुळबुळत राहिला, राजर्षी म्हणाले, "ज्याला स्वतःच पुढच्या क्षणाच भविष्य माहिती नाही, तो इतरांच्या आयुष्याचं भविष्य काय सांगणार ? इतरांचं नशीब घडवणारे तुम्ही तुमचं नशीब घडवायचं सोडून दारोदार असे दक्षिणेच्या गिन्न्या गोळा करत हिंडला नसता !"
लक्षात ठेवा, भविष्य तळहातांवरच्या रेषांवर नाही. मनगटाच्या पराक्रमावरच घडवता येत. नशिबावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वतःवर भरोसा ठेवा. कर्तुत्वावर विश्वास ठेवा. यश मिळेलच !